No Comments

कैवल्याचा आनंद

आपल्याकडे भगवंतापेक्षा भक्ताला मान मोठा आहे. जेव्हा पालखी येते, तेव्हा विठ्ठल-विठ्ठ्लपेक्षा निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम – `ग्यानबा तुकाराम’, ग्यानबा तुकाराम याचा गौरव जास्त होत असतो. इथं आज झालेला माझा जो गौरव आहे, तो मी गाण्याचा भक्त म्हणून झालेला आहे, हे मला निश्र्चितच कळतंय. मी सुरांसाठी जितकी भिक्षा मागितलेली आहे, तितकी इतर कशासाठीही मागितलेली नाही. हे सगळं कशासाठी? तर गाण्यासाठी. माझं भरून दुसरीकडे देण्यासाठी नव्हे, तर माझ्या हृदयात साठवून ठेवण्यासाठी केलेलं आहे. रवींद्रनाथ टागोरांची एक ओळ आहे, `तू सरे लगायी आग’. तू सुरांची आग माझ्या प्राणाला लावलीस, असं म्हटलेलं आहे. ही मोठी माणसं जी असतात, ती आपल्या प्राणाला सुरांची आग लावून जात असतात. आपण जिवंत असेपर्यंत ती आग काही विझत नाही. ती आग लावल्याबद्दल आपण त्यांच्यावर रागावण्याऎवजी कृतज्ञ व्हावं, ही कलेची किमया आहे. आपण कोणीतरी मोठे झालोय, असं आपल्याला वाटतं. उत्तम गाणं ऎकल्यानंतर, आपण अधिक श्रीमंत झालो आहोत असं वाटतं.

ही श्रीमंती या लोकांनी आपल्याला दिली आणि त्या श्रीमंतीचा हा हा गौरव आहे. हा स्विकारण्याचा गौरव नाही, देण्याचा गौरव आहे, असं मला वाटतं. आणि अशा रीतीनं हा कलावंताचा उत्सव इथे साजरा होणं, याला अर्थ आहे. भारतीय संस्कृती म्हणा किंवा माणसाची संस्कृती म्हणा, दोन गोष्टींवर अधिष्ठीत आहे, असं मला वाटतं. एक म्हणजे आठवड्याचा बाजार आणि एक वर्षाचा उत्सव. आठवड्याचा बाजार हा तुमच्या शरीराच्या ज्या गरजा आहेत, त्या पुरवण्यासाठी असतो; आणि वर्षाचा उत्सव तुमच्या मनाच्या ज्या गरजा आहेत, त्या पुरवण्यासाठी असतो. एक फार सुंदर चिनी म्हण आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की, `तुम्हांला दोन पैसे मिळाले, तर एका पैशाचे धान्य आणा, आणि एक पैशाचं फूल आणा. एक पैशाचं धान्य तुम्हांला जगवेल आणि फूल तुम्हांला कशासाठी जगायचं हे कारण सांगेल.’ संगीत तुम्हांला, का जगायचं याचं कारण सांगतं. तुम्हांला जगायचं आहे कशासाठी? मला मोगुबाई ऎकायच्या आहेत, मला भीमसेन ऎकायचे आहेत, मला किशोरीबाई ऎकायच्या आहेत, मला दिनानाथांचं गाणं ऎकायचं आहे. याच्यासाठी जगायचंय. सगळ्या कलांचा आनंद घ्यायचाय. मराठीमध्ये, आपल्या भाषेमध्ये, तो शब्द्सुद्धा तसाच हवा.

आपण पोटासाठी जे काही करतो, त्याला `उपजीविका’ म्हणतात. ती `जीविका’ नाही. जीविका कशासाठी? तर चित्रकलेसाठी, आनंदासाठी, अभिनयासाठी, नर्तनसाठी. यासाठी जगणं ही खरी जीविका आहे, आणि ती जिविका कलावंत माणसं देत असतात, म्हणून हा उत्सव वर्षातून एकदा साजरा होणं, हे आपल्या परंपरेला धरून आहे. गोव्यातील लोकांना मी जत्रा, महोत्सव यांबद्दल सांगणं हे चुक आहे. हा सगळा उत्सवांचा प्रदेश आहे. बोरकरांनी म्हटल्याप्रमाणे `माझ्या गोव्याचा भूमीत, येतं चांदणं माहेरा….’ मला तर वाटतं, `माझ्या गोव्याच्या भूमीत येतं संगीत माहेरा,’ असं म्हणायला पाहिजे. म्हणून माहेरवाशीणीचे जसे लाड होतात, तसे संगीताचे लाड या गोमंतकाच्या भूमीत झालेले आहेत. अनेक तऱ्हांनी इथं ते फुललेलं आहे. देवाच्या अर्चनेसाठी फुललेलं आहे, शेतात काम करण्यांसाठी फुललेलं आहे, होडीवरती फुललेलं आहे, मैफलीत फुललेलं आहे, बैठकीत फुललेलं आहे, सगळीकडे फुललेलं आहे. श्रीमंत आई-वडिलांनी आपल्या पोरीचे लाड करावेत, तिला असं नटवावं, तिला तसं नटवावं तशा रीतीनं लोकांनी या संगीताच्या कलेकडं पाहिलेलं आहे. आणी त्यातली देदीप्यमान रत्नं- दिनानाथांसारखी किंवा मोगूबाईंसारखी किंवा इतर अनेक आपण पाहत आलेलो आहोत. आणि आनंदाची गोष्ट अशी की, ही परंपरा संपलेली नाही. ही संपण्याइतपत लेचीपेची परंपरा नाही. पुष्कळ लोक असं म्हणतात की, शाश्रीय संगीत टिकणार की नाही, याबद्दल शंका यायला लागली आहे. त्या लोकांना, चांदणे टिकणार की नाही. अशी शंका यावी इतकं ते मला हास्यास्पद वाटतं. कधीतरी मी बैठकीला जातो. एखादा भूप राग चालू असतो. माझ्या मनात विचार येतो की, हजारो वर्षांपूर्वी तयार झालेला हा राग – त्याचा असर आज १९८५ सालीसुद्धा आमच्या अंगावर तसाच पडतो. त्या वेळचं काय वातावरण असेल? लोक घोड्यावर बसून आलेले असतील, पार्टी करुन आलेले असतील. आणि तोच भूप ऎकतात. हा काय चमत्कार आहे?

You might also like
Tags: marathi, marathi sahitya, pula deshpande, sahitya

More Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Fill out this field
Fill out this field
Please enter a valid email address.