Posts by admin
तिन्ही सांजा सखे मिळाल्या
राजा ललकारी अशी दे
रेशमाच्या रेघांनी
उपास (बटाटयाची चाळ)
आहे मनोहर तरी..
हे आत्मचरित्र नाही.
आठवणींच्या प्रदेशातली ही स्वेर भटकंती. पाखरांसारखी क्षणात या फांदीवरून त्या फांदीवर ,कुठूही. दिशाहीन. पण स्वतःच्याच जीवनसूत्राशी अदृश्य संबंध ठेवत केलेली.
आयुष्यात प्रत्यक्ष भेटलेली माणसे यात नाहीत. म्हणजे त्यांना मी विसरले असे नव्हे. पण या विशिष्ट भटकंतीत ती भेटली नाहीत इतकेच. आणि जी भेटली, तीही त्या त्यासंदर्भात भिडली तितकीच इथे उमटली. त्यांचेही हे संपूर्ण चित्र नव्हे.
पाण्यात ओढस लागण्याचे प्रसंग आयुष्यात सतत येत असतात. ही स्थळातून जळात आणि जळातून स्थळात जाण्याची ओढ (की खोड?) टागोरांनाही होती असे त्यांनी म्हटलेय. मग माझ्यासारख्या सामान्यांची काय कथा ?
प्रत्येकाने स्वतःच्या शालेय जीवनात आपण पुढे कोण होणार यावर एकतरी निबंध लिहिलेला असणारच. स्वतःचे ते आदर्श चित्र निबंधाच्या वहीतच राहते. पुढे कधीतरी प्रौढवयात आपल्यातले ते नार्सिससचे फूल दरवळायला लागले की कालप्रवाहाच्या सतत हलणाऱ्या पाण्यात दिसणारे स्वतःचे प्रत्यक्ष प्रतिबिंब आणि ते वहीतले चित्र यांचे काहीतरी नातेजाणवते का ?
अशा अनेक प्रश्नांचा हा आलेख.आमच्या संसारातल्या सततच्या धावपळीतून गेल्या चार-पाच वर्षात अधून मधून वेळ मिळेल तसे, थोडेथोडे तुकडया तुकडयांनी केलेले हे लिखाण. कोणतीही योजना न आखता केलेले. त्यामुळे सुरूवातीचा मूडही अधूनमधून बदलणे स्वाभाविकच आहे.
एकटी असले की आताशा कोण कधी समोर येऊन ठाकेल सांगता येत नाही.
कधी बोरकरांनी पाठवलेले गडद निळे जलद भरभरून येतात आणि आकाश धुऊन स्वच्छ करतात. दिवस सोनेरी होतो आणि रात्र रूपेरी. सर्वदूर नक्षत्रांची रांगोळी च रांगोळी. धामापूरच्या आजीच्या बागेतल्या फुलांचा दरवळ घेऊन आलेली हसरी ओलसर नक्षत्र.
