गप्पीदास
एकदा एक मनुष्य आजारी पडला. सगळ्या वैद्यांनी तो काही आता जगणार नाही, असेच सांगितले. तेव्हा त्या माणसाने देवाला नवस केला व म्हटले, देवा, ‘मला दुखण्यातून वाचवलंस तर मी तुला हजार पुतळ्या घालीन.’
हे ऐकून त्याची बायको त्याला म्हणाली, ‘असला अशक्य नवस तुम्ही बोलू नका. आपल्याला ते शक्य होणार नाही.’
तेव्हा तो मनुष्य म्हणाला, ‘देव कुठे त्या हजार पुतळ्यांसाठी आपल्या दारात येणार आहे. त्याला दुसरे पुष्कळ उद्योग आहेत.’
पुढे तो मनुष्य खरेच बरा झाला व त्याने पिठाच्या हजार पुतळ्या करून देवाला दिल्या. ते पाहून देव भयंकर चिडला व तो भूताचे सोंग घेऊन त्या मनुष्याच्या स्वप्नात गेला व म्हणाला, ‘अरे, तू रानात डोंगराच्या पायथ्याशी खणून पहा, तुला तिथे द्रव्य मिळेल.’
दुसरे दिवशी तो मनुष्य द्रव्याच्या लोभाने रानात गेला. तेव्हा त्याला रानात चोरांनी पकडले व त्याचे काही एक न ऐकता गुलाम म्हणून विकून टाकले.
तात्पर्य – नुसत्या गप्पा मारून चालत नसते. तसे करणारा मनुष्य केव्हातरी गोत्यात येतोच.
Categories: बाल जगत
Sorry, comments are closed for this item.